गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर प्रशासनाने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक आणि नागपूर येथील विशेष पथके आज जपतलई येथे दाखल होऊन घटनास्थळाची पाहणी आणि आश्रमशाळेतील सुरक्षाव्यवस्थेची सखोल तपासणी करणार आहेत.
निवासी विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? आश्रमशाळेच्या व्यवस्थापनाकडून सुरक्षा नियमांचे पालन झाले का? सर्पदंशाची घटना नेमकी कशी घडली? या सर्व बाबींची चौकशी केली जाणार आहे.चौकशीत निष्काळजीपणा किंवा सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
उपचाराधीन तीन विद्यार्थिनींना तातडीने उपचार
या घटनेतील अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून, त्यांना तातडीने सर्पदंश प्रतिबंधक औषध (अँटी-व्हेनम) देण्यात आले आहे. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, उपचाराधीन विद्यार्थिनींच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक बारकाईने लक्ष ठेवून आहे.
उपचारात कोणतीही कमतरता राहू नये आणि विद्यार्थिनींची विशेष काळजी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या आहेत.
सहपालकमंत्र्यांकडून शोक व्यक्त
या हृदयद्रावक घटनेबद्दल सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दुःख व्यक्त करत मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली. उपचाराधीन विद्यार्थिनींना आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार आणि सहकार्य देण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
जपतलई आश्रमशाळेतील या घटनेनंतर आता चौकशीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेत नेमकी कुठे आणि कोणाची चूक झाली, हे चौकशीतून स्पष्ट होणार आहे.













