मुलचेरा:कोपरअली–विश्वनाथनगर मार्गावरील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास दुसऱ्याही दिवशी कायम राहिला. सोमवारी घडलेल्या घटनेनंतर तहसीलदार चेतन पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने रस्ता दुरुस्त करण्याचे सक्त निर्देश दिले होते. त्यानंतर विभागाकडून तात्पुरते आणि थातूरमातूर स्वरूपाचे काम करण्यात आले. मात्र या कामाचा कोणताही परिणाम दिसून आला नाही.
मंगळवारी सकाळीही मानव विकास मिशनची बस विद्यार्थ्यांना घेऊन मुलचेराकडे जात असताना त्याच ठिकाणी चिखलात बसची चाके रुतू लागली. पुढे गेल्यास बस अडकण्याची शक्यता लक्षात घेऊन चालकाने बसला माघार घेतली. परिणामी महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावरच अडकले आणि त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
कोपरअली–विश्वनाथनगर मार्गावरील आठवडी बाजार परिसरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून चारचाकी वाहनांनाही या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. प्रशासनाच्या निर्देशानंतर करण्यात आलेल्या तात्पुरत्या दुरुस्तीमुळे परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे प्रत्यक्ष चित्रातून स्पष्ट होत आहे.लगाम परिसरातील शेकडो विद्यार्थी दररोज मानव विकास बसने मुलचेरा येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र सलग दुसऱ्या दिवशीही बसला माघार घ्यावी लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांमध्येही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ औपचारिकता न करता रस्त्याची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करावी, जेणेकरून विद्यार्थी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास थांबेल, अशी जोरदार मागणी केली आहे.













