गडचिरोली: जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक दुर्गम गावांचा संपर्क तुटलेला असतानाच भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लाहेरी येथील एका गंभीर रुग्णाचे गडचिरोली पोलिसांच्या पवन हंस हेलिकॉप्टरच्या मदतीने तातडीने वैद्यकीय स्थलांतर करण्यात आले. पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेमुळे संबंधित युवकाला वेळेत उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रावती, पामुलगौतम आणि पर्लकोटा नद्यांना मोठा पूर आला असून भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत शुक्रवार (दि. 31 जुलै) रोजी लाहेरी येथील रहिवासी शामसुंदर नरोटी (वय 35) यांची विषबाधा अथवा सर्पदंशामुळे प्रकृती गंभीर झाल्याची माहिती प्रशासनाला मिळाली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आणि गडचिरोली पोलीस दलाने तातडीने समन्वय साधत पवन हंस हेलिकॉप्टर भामरागडकडे रवाना केले. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शामसुंदर नरोटी यांना सुरक्षितपणे गडचिरोली येथे आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
या घटनेनंतर गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी किंवा आपत्कालीन सेवांशी संपर्क साधावा. वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
ही संपूर्ण बचाव व वैद्यकीय स्थलांतर मोहीम गडचिरोली पोलीस दल, जिल्हा प्रशासन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भामरागड, पोलीस ठाणे भामरागड, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पवन हंसचे पायलट अरविंद सैनी आणि राजीव शर्मा यांच्या समन्वयातून यशस्वीपणे पार पडली.
पूराच्या संकटात प्रशासन आणि पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका नागरिकाचे प्राण वाचले असून या कार्यवाहीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.













