मुलचेरा:गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुलचेरा तालुक्याला जोरदार तडाखा दिला असून मुलचेरा तालुक्याचा बाह्य संपर्क पूर्णपणे तुटला आहे. मुलचेरा ते कोपरअली दरम्यान असलेला दीना नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सलग सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. आलापल्ली–मुलचेरा आणि मुलचेरा–आष्टी हे तालुक्याचे प्रमुख मार्ग बंद झाल्याने प्रवाशांसह अत्यावश्यक सेवांवरही परिणाम झाला आहे. अनेक गावांचा संपर्क खंडित झाला असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दक्षिण गडचिरोलीत पावसाचा जोर अद्याप कायम असून पाण्याची पातळी वाढत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत.
प्रशासनाने नागरिकांना पूर आलेले पूल, नाले आणि रस्ते ओलांडू नयेत, अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. मुलचेरा तालुक्यातील परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत.













