अहेरी :आष्टी–आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (क्र. 353-सी) वरील प्रवाशांचा जीवघेणा प्रवास काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी सकाळी झालेल्या संततधार पावसामुळे आलापल्ली–सिरोंचा मार्गावरील रेपणपल्ली जवळील तात्पुरता वळण रस्ता वाहून गेल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी अनेक वाहने अडकून पडली असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मागील अनेक वर्षांपासून या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. दरवर्षी पावसाळ्यात याच समस्येची पुनरावृत्ती होत असून नागरिकांना अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
ज्या ठिकाणी पुलांचे बांधकाम सुरू आहे, तेथे तात्पुरते वळण रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र हे रस्ते मजबूत नसल्याने थोड्याशा पावसातही वाहून जातात आणि संपूर्ण वाहतूक ठप्प होते. ही समस्या आता नित्याचीच बनली असली तरी पावसाळ्यापूर्वी कोणतीही प्रभावी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली असली, तरी पर्यायी मार्गांची सक्षम व्यवस्था उभारण्यात आलेली नाही. दुसरीकडे कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने त्याचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
सकाळपासून या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. विशेष म्हणजे अद्याप पावसाने पूर्ण रौद्ररूप धारण केलेले नाही. पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस झाल्यास इतर तात्पुरते वळण रस्तेही वाहून जाण्याची शक्यता असून हा महामार्ग पुन्हा पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एसटीने घेतली माघार; कमलापूर मार्गाचा अवलंब
या परिस्थितीचा फटका एसटी सेवेलाही बसला आहे. अहेरी–सिरोंचा (MH-40 AQ-6116) ही बस रेपणपल्लीजवळ अडकली. त्यानंतर बसला माघारी फिरवून गोलाकर्जी–राजाराम–छलेवाडा–कमलापूर मार्गे पुन्हा रेपणपल्ली गाठण्याचा निर्णय घेण्यात आला. या पर्यायी मार्गामुळे तब्बल 23 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.
सकाळी 7 वाजता अहेरी आगारातून निघालेली बस दुपारपर्यंतही रेपणपल्ली गाठू शकली नव्हती. अशा परिस्थितीत सिरोंचा गाठण्यासाठी अजून किती वेळ लागणार, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
पावसाळा सुरू होताच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353-सी वरील ही परिस्थिती दरवर्षीचीच बनली आहे. रखडलेले बांधकाम, अपुऱ्या पर्यायी व्यवस्था आणि जबाबदार यंत्रणांची उदासीनता यामुळे दक्षिण गडचिरोलीतील हजारो नागरिकांचा प्रवास आजही संकटमय बनला आहे.













