मुलचेरा : पोटाची खळगी भरण्यासाठी रोजंदारीच्या कामावर गेलेल्या पत्नीला सायंकाळी घरी आणण्यासाठी निघालेल्या पतीचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सायंकाळी मुलचेरा तालुक्यातील गोमनी-चिचेला मार्गावर घडली. या घटनेमुळे गोमनी गावावर शोककळा पसरली असून राजुलवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या अपघातात उमाजी वागूजी राजुलवार (वय ४५, रा. गोमनी, ता. मुलचेरा) यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, उमाजी यांची पत्नी नवला या वन विभागाच्या रोपवनातील रोजंदारीच्या कामासाठी चिचेला जंगल परिसरात गेल्या होत्या. सायंकाळी त्यांना घरी घेऊन येण्यासाठी उमाजी आपल्या दुचाकीने (एमएच-३३ एए-१४३३) गोमनीहून निघाले. लगाम फाटा ओलांडल्यानंतर काही अंतरावर त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात उमाजी यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. उमाजी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार असून घटनेनंतर कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.माहिती मिळताच मुलचेरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास मुलचेरा पोलीस करीत आहेत.
दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दुचाकीवरील नियंत्रण सुटले की अन्य काही कारण होते, याचा तपास पोलीस करीत असून शवविच्छेदन अहवाल व तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.













