अहेरी: येथील महिला व बाल रुग्णालयातील रिक्त वैद्यकीय पदे तातडीने भरावीत या मागणीसाठी नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्या नेतृत्वात सोमवारी (२९ जून) छेडण्यात आलेल्या ‘ताला ठोको’ आंदोलनाला पोलिसांनी प्रवेशद्वारावरच रोखले. रुग्णालयाला कुलूप ठोकण्यासाठी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्यासह चार आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
यापूर्वीच नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी २२ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपविभागीय अधिकारी, अहेरी यांच्यामार्फत निवेदन सादर करून महिला व बाल रुग्णालयातील रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून इतरही पदे तातडीने भरण्याची मागणी केली होती. निवेदनात २८ जूनपर्यंत पदभरती न झाल्यास २९ जून रोजी ‘ताला ठोको’ आंदोलन आणि त्यानंतर ३० जूनपासून राजे विश्वेश्वरराव महाराज चौक येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता.
त्यानुसार सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजता अमोल मुक्कावार यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते महिला व बाल रुग्णालय परिसरात दाखल झाले. यावेळी रिक्त पदे तातडीने भरावीत या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांना सुरुवातीला पोलिसांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच थांबविले. त्यानंतर महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. डी. मडावी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे डेप्युटी डायरेक्टर यांच्याशी आंदोलनकर्त्यांचा संवादही घडवून आणला. मात्र, पदभरतीबाबत ठोस आश्वासन मिळाले नसल्याने आंदोलनकर्त्यांनी रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा निर्णय कायम ठेवला.
आंदोलनकर्ते रुग्णालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच प्रवेशद्वारावर तैनात पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्यासह चार जणांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत ताब्यात घेतले. त्यामुळे संभाव्य तणाव टळला आणि रुग्णालयातील कामकाज सुरळीत सुरू राहिले.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वात रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले.
दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतरही आंदोलन मागे घेण्यात आलेले नसून, प्रशासनाकडून समाधानकारक निर्णय न झाल्यास पूर्वघोषणेनुसार ३० जूनपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी कायम ठेवला आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन पुढे काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













