गडचिरोली: जिल्ह्यात १२ ऑगस्टच्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून मुलचेरा तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला.

काल रात्रीपासून जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाने कहर केला असून आज सकाळीच नदी,नाल्यांना पूर आला.दरम्यान मुलचेरा तालुक्यातील दिना नदी आणि चाची नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने मुलचेरा तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.सकाळी जवळपास ८.३० वाजताच्या सुमारास दीना आणि चाची नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने सदर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
अहेरी आगाराची अहेरी-मुलचेरा-नागपूर बस गेल्यावर इतर मानव विकास मिशन आणि प्रवाश्यांना घेऊन जाणारे एसटी बस तालुका मुख्यालयात अडकले आहे.दरम्यान नदी-नाल्यावरून पाणी वाहत असताना कुणीही पूल ओलांडू नये असे आवाहन तहसीलदार चेतन पाटील यांनी केले आहे.













