गडचिरोली(महेश गुंडेटीवार): किर्र जंगल, धो धो बरसणारा पाऊस, खाली उडी मारावी तर समोर साक्षात मृत्यू… अशा विचित्र परिस्थितीत एका शासकीय कर्मचाऱ्याने पूर आलेल्या नाल्याच्या मध्यभागी असलेल्या एका झाडावर तब्बल पाच तास काढले. अत्यंत कठीण परिस्थितीत नैसर्गिक आपत्तीला परतावून लावणाऱ्या त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे उमेश धोडरे आहे.

२३ जुलै रोजी जिल्ह्याच्या दक्षिण भागात दमदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच धो धो बरसल्याने परिसरातील नदी,नाले तुडुंब भरले. सायंकाळच्या सुमारास ही परिस्थिती आणखीनच गंभीर झाली. अशा परिस्थितीत मुलचेरा पंचायत समिती अंतर्गत येत येत असलेल्या गोमनीचे ग्रामपंचायत अधिकारी उमेश धोडरे (४५) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास आपल्या इको स्पोर्ट या चारचाकी वाहनाने (आपले स्व गावी) चंद्रपूर कडे निघाले.गोमनी ते लगाम रस्त्यावरील कोलपल्ली नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत होते.अशा परिस्थितीत त्यांनी नाला ओलांडण्याचा प्रयत्न केला.मात्र अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यांची चारचाकी नाल्यात वाहून गेली.चारचाकी वाहन झाडाला अडकल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखत त्याच झाडावर चढले.त्या परिसरात नेटवर्क असल्याने त्यांनी ग्रामपंचायत सदस्य शुभम शेंडे यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून या घटनेची माहिती दिली.

जवळपास सायंकाळी ४.३० वाजता शुभम शेंडे यांनी गोमनी गावातील ८ ते १० तरुणांना घेऊन कोलपल्ली नाला गाठले.मात्र,मुसधार पाऊस आणि नाल्याला मोठा पूर,चारही बाजूंनी पाण्याचा वेढा अशा परिस्थितीत जवळपास अर्धा किलोमीटर दुरूनच उमेश धोडरे यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून धीर देत त्यांना तसेच झाडावरच राहण्याचा सल्ला देत युवकांनी झाडांना दोरी बांधून त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला.मात्र शक्य झाले नाही.अश्यात उमेश धोडरे यांचा डिस्चार्ज झाल्याने मोबाईल देखील बंद झाला.ही माहिती वाऱ्यासारखी पसरल्यावर प्रशासनाने धावापड सुरू केली.किर्र अंधारात मुलचेराचे गटविकास अधिकारी एल बी जुवारे आणि त्यांच्या चमूने चारचाकी वाहन सुरू करून रोषणाई केली.काही तरुण दोरीच्या सहाय्याने पुलाजवळ जाऊन उमेश धोडरे यांच्याशी मोठ्या आवाजाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. गावातील तरुणांचा प्रयत्न पाहून उमेश धोडरे यांच्या जीवात जीव आला. मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील, ठाणेदार महेश विधाते, अहेरीचे ठाणेदार हर्षल एकरे तसेच बचाव पथक गटनास्थळ गाठले. तोपर्यंत गोमणीचे युवक उमेश धोडरे यांच्यापर्यंत पोहोचले होते. रिंग, लाईफ जॅकेट आदी बचाव सामुग्रीचा वापर करून जवळपास रात्री १० वाजताच्या सुमारास त्यांना वाचविण्यात यश आला.

विशेष म्हणजे गोमनी येथील युवकांनी केलेले धाडस हे कौतुकास्पद होते. त्यांच्या मदतीला मुलचेराचा अख्ख प्रशासन धावत आले. जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा आणि पोलीस अधीक्षक निलोप्पल हे भ्रमणध्वनी द्वारे येथील अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात होते. उमेश धोडरे यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढल्यानंतर रुग्णवाहिकेत आरोग्य तपासणी करून मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
काळ आला होता, पण वेळ नाही. दैव बलवत्तर म्हणून वाचलो, मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परतलो अशा भावना पुरात अडकलेले ग्रामपंचायत अधिकारी उमेश धोडरे यांनी व्यक्त केल्या.
रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्यांनी मार्ग बदलला

गोमणी – मुलचेरा -आष्टी या रस्त्यावर खड्ड्यांचा साम्राज्य असल्याने नागरिकांना जीव घेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे खड्डे वाचविण्यासाठी चारचाकी वाहनधारक गोमणी- लगाम- आष्टी या मार्गाचा अवलंब करतात.उमेश धोडरे यांनी देखील असाच केला. मात्र दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कोलपल्ली नाल्यावरील पूल पाण्याखाली गेला होता. उमेश धोडरे यांचा अति आत्मविश्वास त्यांचाच अंगलट आला. मात्र ऐन वेळेवर गोमणी येथील तरुणांनी आणि प्रशासनाने धाव घेतल्यामुळे अनुचित प्रकार टळला.













