मूल प्रतिनिधी :- गेल्या काही दिवसांत जिल्ह्याच्या इतर भागांत समाधानकारक पाऊस झालेला असताना, मूल तालुक्यात मात्र वरुणराजाने पाठ फिरवली आहे. सुरुवातीला थोडाफार पाऊस झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी भातपिकाची पेरणी केली होती आणि रोवणीसाठी शेतं तयार केली होती. मात्र आता सलग काही दिवस पाऊस न पडल्यामुळे शेतातील पाणी आटू लागले असून, रोवणीची कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत.
तालुक्यातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाची साधने मर्यादित असल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोसीखुर्द प्रकल्पातून तत्काळ पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
गोसीखुर्दचे पाणी ठरेल जीवनदायी
मूल तालुका हा धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. मात्र सिंचनासाठी आवश्यक पाणी वेळेवर उपलब्ध न झाल्यास या भागातील शेतकऱ्यांच्या हातचे पीक निघून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः गोसीखुर्द कालव्यावरील काही गावांमध्ये दरवर्षी भातपिकासाठी हे पाणी संजीवनी ठरते. मात्र यंदा अद्यापही पाणी सोडण्यात आलेले नाही.
पाणीवाटप संस्थेचे शेतकऱ्यांचे आवाज
या पार्श्वभूमीवर पाणीवाटप संस्था विरईचे अध्यक्ष अनिल निकेसर, तयुब खा पठाण, सुरेशजी कामडे, नेताजी जेंगठे, संजय गिरडकर, नंदाजी चौधरी, अजय वाढई, नितीन राऊत, शांताराम चौधरी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी गोसीखुर्द प्रकल्पातून पाणी सोडण्याची जोरदार मागणी केली आहे.
नजर आभाळाकडे, आशा गोसीखुर्दवर
सध्या वरुणराजाची अनिश्चितता आणि गोसीखुर्दच्या पाण्याची प्रतीक्षा यामधून शेतकरी अक्षरशः अडचणीत सापडला आहे. रोवणीचा योग्य कालावधी हातातून निसटण्याच्या मार्गावर असून, शासनाने किंवा पाटबंधारे विभागाने त्वरीत दखल घेऊन गोसीखुर्दचे पाणी सोडावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या हातचे पीक संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे.
शेतकरी संघटनांनी आणि स्थानिक नेत्यांनीही या मागणीला पाठिंबा देत प्रशासनाला लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.













