वरोरा :- गेल्या ३५ वर्षांपासून मराठा सेवा संघ ही चळवळ शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेचा वारसा जपत सामाजिक समता, बंधुता व न्यायाधिष्ठित समाजव्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करते आहे. आपल्या ३३ कक्षांद्वारे ही पुरोगामी विचारांची ज्योत अखंड तेवत ठेवण्यात आली आहे.
त्याच या कार्याचा प्रभाव म्हणून ‘जिजाऊ रथयात्रा’ ही संपूर्ण महाराष्ट्रात मानवतेचा संदेश देत भ्रमण करत आहे. धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक बनलेली ही यात्रा जिथे जिथे पोहोचते आहे, तिथे तिथे समाजातील सर्व थरांतून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. येत्या १० एप्रिल २०२५ रोजी ही यात्रा चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करणार असून, चंद्रपूर नगरीने तिच्या स्वागतासाठी कंबर कसली आहे.
आज ज्या काळात सामाजिक आणि राजकीय वातावरण धार्मिक द्वेषाने व जातीय विघटनाने विषारी बनले आहे, त्या काळात ‘जिजाऊ रथयात्रा’ ही दुभंगलेल्या मनांना जोडणारी नवसंजीवनी ठरत आहे. न्याय, समता, बंधुता व एकतेचा धागा पुन्हा विणण्याचं हे कार्य महाराष्ट्र अनुभवतो आहे.
“मानव हीच जात, आणि मानवता हाच धर्म” या महामंत्रासह, जिजाऊंच्या रूपात शिवधर्माची ही ज्योत महाराष्ट्रभर प्रज्वलित होत आहे.
देश आज खाजगीकरण, भ्रष्टाचार, धार्मिक दहशतवाद, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अर्थव्यवस्थेची घसरण, गरिबी, दारुबंदीचं नाममात्र अस्तित्व, शिक्षण व स्पर्धा परीक्षांचा ऱ्हास अशा अनेक गंभीर संकटांत होरपळत आहे.
या संकटांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी काही सत्ताधारी जातीय व धार्मिक विष पसरवत समाजात तेढ निर्माण करत आहेत. युवकांना धर्मांधतेचं विष पाजून त्यांचे भविष्य अंधारात लोटले जात आहे.
यापासून समाजाला जागं करण्याचं व सावरण्याचं काम जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून केलं जात आहे.
ही यात्रा १८ मार्च २०२५ रोजी शहाजी राजेंच्या जन्मभूमी वेरूळ येथून सुरू झाली असून १ मे २०२५ रोजी पुण्याच्या लाल महालात सांगता होणार आहे.
या ऐतिहासिक प्रवासाचं साक्षीदार होण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. ही केवळ यात्रा नाही, ही आहे समाज परिवर्तनाची चळवळ.













