अहेरी:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘नॅशनल मेरीट कम मिन्स स्काॅलरशीप’ (एनएमएमएस) परीक्षेत अहेरी येथील मॉडेल हायस्कुलचा विध्यार्थी आरुष महेश बेझंकीवार हा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे २००७-०८ पासून एनएमएमएस शिष्यवृत्ती योजना परीक्षा घेतली जात आहे. राज्यात परीक्षा परिषदेतर्फे डिसेंबर महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. ७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची यादी जाहीर करून विद्यार्थ्यांच्या जात, दिव्यांगत्व, जन्म दिनांक अशी दुरुस्ती असल्यास १८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.प्राप्त दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांची निवड यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. राज्याच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच सर्व जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे सातवी, आठवीची विद्यार्थीसंख्या, १२ ते १४ वयोगटातील संख्येच्या आधारे जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आला आहे.त्यात पीएमश्री मॉडेल हायस्कुल,अहेरी येथील तब्बल १६ विविध संवर्गातील विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले.
यात आरुष महेश बेझंकीवार याने ११० गुण प्राप्त करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर समीक्षा बालाजी रेषे ९५, रहेमान कुरेशी ९१, नव्या पोनलवार ७४,सोहम मुक्कावार ७४,सोहम मोरे ७९,धनुष झोडे ६२,शीतल झाडे ७८,तेजस धुळसे ७४,साक्षी आलाम ६४,लुझान पेंदोर ६७,आराध्या दुर्गे ६५,श्रेयस धुर्योधन ८६,शिरीष चव्हाण ९१,माही रामटेके ८४,पार्थ दुर्योधन ६७ यांनीं प्राविण्य प्राप्त केला आहे. या शाळेतील २९ विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा परीक्षा दिली होती त्यातील तब्बल १६ विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केला आहे हे विशेष.३ एप्रिल रोजी शाळेतील सभागृहात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी राजेंद्र टिचकुले शिक्षण विस्तार अधिकारी विनोद पुसालवार,सुनील आइंचवार,मुख्याध्यापक प्रमोद रोहनकर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश बेझंकीवार तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वार्षिक बारा हजार रुपये मिळणार शिष्यवृत्ती
आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शाेध घेणे तसेच त्याला बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्फत ही शिष्यवृत्ती याेजना राबविली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यास इयत्ता ९ वी ते १२ पर्यंत दरमहा १ हजार रुपये (वार्षिक १२ हजार रुपये) शिष्यवृत्ती देण्यात येते.













