शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
श्रीमान किल्ले रायगडावर शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने मागील दहा वर्षांपासून साजरा होत असलेल्या राज्याभिषेक सोहळ्याचा दशकपूर्ती महोत्सव यंदा विशेष संकल्पनेत साजरा करण्यात आला. **क्रांतीसूर्य शंभूराजे स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा सन्मान** म्हणून शहीद क्रांतिकारकांच्या वंशजांच्या हस्ते भारतातील विविध पवित्र नद्यांच्या जलाने जलाभिषेक करण्यात आला. या ऐतिहासिक क्षणी रायगडावर शिवभक्त आणि शंभूभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोहळ्याची सुरुवात महादरवाजा पूजन, गडदेवता शिरकाई देवीचा जागरण गोंधळ, आणि गडावरील तेराव्या ज्योतिर्लिंग जगदीश्वर महापूजेनं झाली. पहाटे तीन वाजता महापूजेसह कार्यक्रमाला प्रारंभ झाला. श्री धर्मरक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या शंभूभक्तांनी महापूजेची जबाबदारी पार पाडली, तर संस्थेच्या अध्यक्षा मिताली ताई गरड पाटील यावेळी प्रमुख उपस्थित होत्या.
सकाळी राजमाता जिजाऊंच्या पूजनानंतर युवराज बिरुदे, राजचिन्हे, आणि छत्रचामरे थोरल्या महाराजांकडून आशीर्वाद घेऊन शिवसमाधीपासून पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. गडावर ढोल-ताशांच्या गजरात आणि हर हर महादेवच्या घोषणांमध्ये जरीपटका फडकविण्यात आला. नगारखान्याजवळ सुवासिनींनी छत्रपती संभाजी महाराजांचे औक्षण केले.
राज्याभिषेकाच्या विविध विधींनंतर भंडाऱ्याची उधळण आणि साखर वाटपाने सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यात विविध शिवकार्य करणाऱ्या संस्थांनी सहभाग घेतला आणि रायगडावर शिवमय वातावरण निर्माण केले.













