गडचिरोली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गडचिरोलीच्या सुमानंद सभागृहात पार पडलेल्या या शिबिरात गडचिरोली, धानोरा आणि चामोर्शी तालुक्यातील २,५६१ पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ, प्रमाणपत्रे, मंजुरीपत्रे आणि आर्थिक सहाय्याचे धनादेश थेट वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलीस अधीक्षक एम. रमेश, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अरुण एम., चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, धानोराचे तहसीलदार गणेश माळी, चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरुडे, नगर परिषदेच्या उपायुक्त अर्चना मेंढे, पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी अनिकेत पाटील तसेच गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिराच्या माध्यमातून विविध विभागांनी एकत्रितपणे नागरिकांना ‘एकाच छताखाली शासकीय सेवा’ उपलब्ध करून दिल्या. आवश्यक प्रमाणपत्रे, मंजुरीपत्रे, आर्थिक सहाय्याचे धनादेश तसेच विविध योजनांच्या मंजुरी जागेवरच देण्यात आल्याने नागरिकांची शासकीय कार्यालयांमधील धावपळ मोठ्या प्रमाणात कमी झाली. शासनाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या दिशेने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली.
महसूल विभाग आघाडीवर
या शिबिरात महसूल विभागाने सर्वाधिक १,७४२ लाभांचे वितरण केले. त्याशिवाय पुरवठा विभागाने १०३, संजय गांधी विभागाने ८४, तालुका आरोग्य विभागाने ७१, नगर परिषद ५८, भूमी अभिलेख विभाग ५६, पंचायत समिती १२४, एकात्मिक बाल विकास सेवा योजना ६३, कृषी विभाग १६३, वन विभाग १९, सहाय्यक दुय्यम निबंधक विभाग २४, उमेद अभियान २९, महावितरण २२ आणि बँक विभागाने ३ लाभांचे वितरण केले. अशा प्रकारे विविध विभागांच्या माध्यमातून एकूण २,५६१ लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला.
सहायक जिल्हाधिकारी अरुण एम. यांनी प्रास्ताविकातून शिबिरामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार वनिश्याम येरमे आणि अरविंद शेंडे यांनी केले, तर तहसीलदार सागर कांबळे यांनी आभार मानले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी चंदू प्रधान, ज्ञानेश्वर ठाकरे, एस. पी. शेख, अल्पेश बारापात्रे, देवेंद्र वाळके, गिरीश नरोटे यांच्यासह सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल कर्मचारी तसेच विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या महसूल समाधान शिबिराने शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश प्रभावीपणे साध्य केला.













