भामरागड:एकेकाळी नक्षलवादामुळे विकासापासून दूर राहिलेल्या विनागुंडा परिसरात आता पोलीस आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून विकासाची नवी पहाट उगवत आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगारानंतर आता शेती क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या उद्देशाने पोलीस मदत केंद्र, विनागुंडा येथे शुक्रवारी (दि. 17 जुलै) ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमांतर्गत ‘प्रोजेक्ट कृषी समृद्धी योजना’ अंतर्गत भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुळ राज, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सत्यसाई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी हर्षवर्धन तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (अतिरिक्त कार्य), भामरागड राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनात आयोजित कृषी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक एस. सुब्रह्मण्यम होते. प्रमुख पाहुणे म्हणून पाटील सर (विनोबा भावे आश्रम शाळा, विनागुंडा), रामा दुर्वा (गाव पाटील) आणि बाळे उसेंडी (गाव पाटील, कुवाकोडी), प्रभारी अधिकारी रोहन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, पोउपनि. सागर मोरे, रोहन सिरसाट आणि सावंत उपस्थित होते.
विशेष म्हणजे, मुसळधार पाऊस सुरू असतानाही परिसरातील शेतकरी व महिला शेतकऱ्यांनी या कृषी मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी शेतकऱ्यांना फार्मर आयडी, ई-पीक नोंदणी, पीएम किसान सन्मान निधी योजना, मृदा परीक्षण, पीक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, कृषी यांत्रिकीकरण, पीक विमा योजना तसेच आधुनिक शेतीतील नवीन तंत्रज्ञानाबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन देण्यात आले.तसेच शेतीसाठी आवश्यक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यामुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ मिळविण्यासोबतच आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळाली.
नक्षलवादाच्या छायेतून विकासाच्या प्रवाहात सामील होत असलेल्या विनागुंडा परिसरात आयोजित हा कृषी मेळावा केवळ शेतीविषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम ठरला नाही, तर पोलीस-प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणारा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.













