अहेरी : पावसाळा सुरू होताच गावातील नाल्यांची सफाई करण्यात आल्याचा दावा ग्राम पंचायतीकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात नाल्यातून काढलेला कचरा व गाळ अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला तसाच पडून असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या नावाखाली केवळ दिखावा सुरू असल्याची टीका ग्रामस्थांमधून होत आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामपंचायतींना स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, नाली सफाई व सार्वजनिक आरोग्य यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र त्या निधीचा योग्य वापर होत आहे का, असा प्रश्न नागेपल्लीतील परिस्थिती पाहता उपस्थित होत आहे. नाल्यांची सफाई करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच नाल्यातून काढलेला कचरा व गाळ तातडीने उचलून त्याची विल्हेवाट लावणे हे ग्रामपंचायत प्रशासनाचे कर्तव्य आहे.
सध्या रस्त्याच्या कडेला पडलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून डास, माश्या व इतर रोगराईला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पावसाचे पाणी या कचऱ्यासोबत पुन्हा नाल्यात जाण्याची शक्यता असल्याने सफाई मोहिमेचाच उद्देश फोल ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने केवळ फोटोसेशन व कागदोपत्री स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता, नाल्यातून काढलेला कचरा तात्काळ उचलून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा स्वच्छ भारत अभियान, १५ वा वित्त आयोग निधी आणि ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या विविध स्वच्छता निधीचा नेमका उपयोग कुठे होत आहे, याचा जाब संबंधित अधिकाऱ्यांनी जनतेला द्यावा, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.













