गडचिरोली: महाराष्ट्र राज्याच्या ६७व्या स्थापना दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमात सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा जोरदार संकल्प घेतला. विकास, शांतता आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीवर आधारित सर्वांगीण प्रगतीचा निर्धार व्यक्त करत त्यांनी जिल्ह्याच्या चमकदार भविष्याची रूपरेषा काढली.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सहपालकमंत्री म्हणाले, “एकेकाळी विकासापासून वंचित असलेला गडचिरोली आज परिवर्तनाच्या टप्प्यावर उभा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात माओवादावर खिंड लावली असून, मोठ्या प्रमाणावर आत्मसमर्पण, अटका व कारवायांमुळे शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस मदत केंद्रे व ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमातून लाखो नागरिकांना योजनांचा लाभ मिळाला आहे.”

औद्योगिक क्रांती व हरित विकासाकडे कसंल्प
शांततेबरोबरच विकासाच्या वेगाने गडचिरोली ‘स्टील सिटी’ म्हणून उदयास येत आहे. खनिज संपत्तीवर आधारित उद्योगांमुळे लाखो रोजगाराची अपेक्षा असून, वनसंपदा जपत पाच कोटी वृक्षलागवड मोहीम राबवली जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग, गडचिरोली-आरमोरी चौपदरीकरणासह रस्ते-पूल प्रकल्पांना गती मिळाली असून, जिल्हा योजनेत ६९७ कोटींचा १००% खर्च झाला आहे.
आरोग्यात ३.० टेस्ला एमआरआय, आयुष्मान भारत लाभ, जल जीवन मिशनद्वारे नळजोड, पायाभूत सुविधांमध्ये क्रांती होत आहे. शेतीत बळीराजा योजना, सौर कुंपण, ‘कोया कृषी कुंभ’, शिक्षणात डिजिटल क्लासरूम व प्रयोगशाळा, महिलांसाठी बचतगट साधनसामग्री व तरुणांसाठी कौशल्य केंद्र उभारले जात आहेत. वनहक्क पट्टेधारकांसाठी ‘फार्मर आयडी’, मनरेगा व वनोपज विक्रीने ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत आहे.
“गडचिरोली ही बदलाची जिवंत कहाणी आहे. विकास, पर्यावरण व सक्षमीकरणाचा समतोल साधून समृद्ध जिल्हा घडवूया,” असे आवाहन करत त्यांनी महाराष्ट्र दिनी सर्वांना संकल्प घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात जिमोच्या चित्ररथाला हिरवी झेंडी, खनिज निधीतून फूड व्हॅन व रुग्णवाहिकांचे लोकार्पण व उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला.













