गडचिरोली: महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने एक लाख रुपयांचा फिरता निधी देऊन गावागावांत आर्थिक क्रांती घडवणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात खरा ‘गेम चेंजर’ ठरेल, असे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. खनिज निधीतून ३ कोटी ५० लाख रुपये मंजूर होऊन सध्या ३५० महिलांना हा निधी वितरित झाला असून, दोन वर्षांत परतफेडीतून पुन्हा इतर महिलांपर्यंत हा निधी पोहोचणार आहे.
या प्रकल्पाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून ग्रामसभा आणि प्रभाग संघटना बळकट होईल, तसेच स्थानिक रोजगाराला चालना मिळेल, असा आशिष जयस्वाल यांचा ठाम युक्तिवाद. एकल महिलांना प्राधान्याने निधी देण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका मिशनच्या (माविम) प्रकल्पाचे व्याज ४% वरून २% पर्यंत कमी करण्याचे निर्देशही सहपालकमंत्री यांनी दिले. यामुळे अधिक महिलांना सुलभ कर्ज मिळेल. बैठकीत पाणीपुरवठा योजना सोलर ऊर्जेवर चालवण्याचे आणि मजूर सहकारी संस्थांना पारदर्शक कामवाटपाचे निर्देश देण्यात आले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहूल काळभोर यांनी सादरीकरणात निधी वितरण, परतफेड यंत्रणा आणि लाभार्थी निवड प्रक्रियेची माहिती दिली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा खाणीकर्म अधिकारी इमरान शेख, जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे उपस्थित होते.













