नागेपल्ली येथील आर. डी. एजंट रवींद्र नामदेव तंगडपल्लीवार (वय ४९) यांच्या निर्घृण हत्याकांडाचा उलगडा अहेरी पोलिसांनी केला आहे.
अहेरी: नागेपल्ली येथील आर. डी. एजंट रवींद्र नामदेव तंगडपल्लीवार (वय ४९) यांच्या निर्घृण हत्याकांडाचा उलगडा अहेरी पोलिसांनी केला असून,आरोपीने सोन्याच्या चैनीच्या लोभातून हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या या घटनेने समाज मूकपणे सुन्न झाला आहे. आरोपी समय्या मलय्या सुंकरी (३७, रा. मुद्दिगुडम, ता. अहेरी) याला मंगळवार २० जानेवारीला अटक करून बुधवार २१ जानेवारीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २८ जानेवारी पर्यंत म्हणजेच ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, आता गुन्हेगारी साहित्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
अहेरी उपविभागातील आलापल्ली हे मध्यवर्ती शहर असले तरी येथे घडलेल्या या क्रूरतेच्या घटनेने सर्वत्र थरार उडाला. रविवारी १८ जानेवारी रोजी आरोपी समय्या सुंकरीने रवींद्र तंगडपल्लीवार यांना आर. डी. देण्याच्या बहाण्याने फोन करून बोलावले. नागेपल्लीहून आलापल्लीत पोहोचल्याची माहिती मिळताच, आरोपीने त्यांना आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर बोलावले. “आधी दारू पार्टी करू” असे सांगून त्याने त्यांना नागमंदिराजवळील जंगल परिसरात नेले.जंगल गाठताच आरोपीने “दारूची बाटली रस्त्यावर पडली” अशी चूक सांगून दुचाकी मागे घेण्याचे सांगितले. मग मागूनच तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर जोरदार वार केला. खाली पडलेल्या रवींद्रवर सपासप वार करून त्याने त्यांना रक्ताच्या थारोळ्यात सोडले आणि गळ्यातील सोन्याची साखळी आणि बोटातील अंगठी लंपास करून पळून गेला. ही क्रूरता पाहून तंगडपल्लीवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, तर समाजातून संतापाची लाट उसळली.
सत्तूरने केले निर्घृण वार, बोटे गळून पडली

पोलिस तपासात असे उघड झाले की, आरोपीने सत्तूर या धारदार हत्याराचा वापर केला. रवींद्र यांनी हाताने प्रतिकार केल्याने सत्तूरचे वार बोटांवर लागले आणि पाच बोटे गळून पडली. हा भयावह अनुभव ऐकून सर्वांचा थरकाप उभा उडाला. गुन्ह्यानंतर आरोपीने दुचाकी, सत्तूर आणि इतर साहित्याची विल्हेवाट लावली. सध्या लूटमारीसाठी हत्या केल्याची कबुली असली तरी पोलिसांचा पुढील तपासात आणखी काळे पैलू उघड होऊ शकतात.
विशेष म्हणजे या घटनेनंतर अहेरी पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवली. रवींद्र तंगडपल्लीवार यांच्यासोबत आरोपीचा भ्रमणध्वनीवर झालेला अखेरचा संपर्कावरून संशयित समय्या सुंकरीला ताब्यात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सात दिवसांची कोठडी मिळाल्याने आता लंपास केलेले सोने, दुचाकी आणि हत्याराचा उलगडा होणार आहे.”तपास अजून सुरू असून आणखी पुरावे सापडण्याची शक्यता आहे.मात्र केवळ सोन्यासाठी झालेल्या इतक्या क्रूर हत्येने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. नागरिकांमधून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे.













