अहेरी: रविवार १८ जानेवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या ‘त्या’ इसमाचा सोमवारी सकाळी जंगल परिसरात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.शरीरावरील भयानक घाव पाहता क्रूर हत्येचा संशय व्यक्त होत आहे. रवींद्र तंगडपल्लीवार (४९, रा. नागेपल्ली) ता.अहेरी असे त्याचे नाव आहे. या घटनेने आलापल्ली-नागेपल्ली परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
रवींद्र तंगडपल्लीवार हे रविवारी दुपारी आर.डी. जमा करण्याचे काम करतात. कामानिमित्त प्रगती बँकेत जाणार असल्याचे सांगून घराबाहेर पडले. लवकरच त्यांचा मोबाईल स्विच ऑफ झाला. घरच्यांनी व मित्रमंडळींनी संपूर्ण सायंकाळ शोध घेतला, पण काहीच मिळेना. सोमवारी सकाळी आलापल्ली ते सिरोंचा (एनएच-३५३सी) मार्गावर पुन्हा शोधमोहीम चालू असताना, नागमंदिराजवळील जंगलात (राष्ट्रीय महामार्गापासून २०० मीटर अंतरावर) त्यांचा मृतदेह सापडला. आलापल्लीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.
डोक्यावर आणि शरीरावर अत्यंत क्रूरपणे केलेले घाव, एका हाताचे पूर्ण बोट छाटलेले आणि तीक्ष्ण हत्याराने हल्ला झाल्याचे स्पष्ट दिसते. मृतदेहाजवळ दोन ग्लास आणि दारूची छोटी बाटलीही आढळली.या क्रूरतेच्या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, हत्येचे कारण व आरोपींचा शोध सुरू आहे.रवींद्र तंगडपल्लीवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनास्थळी अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे,पोलिस निरीक्षक हर्षल एकरे व त्यांचा चमू दाखल झाला. पुढील तपास सुरू आहे.













