गडचिरोली : नक्षलवादावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांमध्ये सुसंवाद आणि संयुक्त कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात पोलिस मदत केंद्रे आणि पोलिस ठाणी उभारण्यात येत आहेत. अबूझमाड सीमेजवळ उभारलेल्या फुलनार (गुंडुरवाही केंद्र) पोलिस मदत केंद्रामुळे या दोन राज्यांमधील समन्वय वाढेल आणि नक्षलवाद संपुष्टात येण्यास मोठी चालना मिळेल, असा विश्वास अप्पर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे यांनी व्यक्त केला. ते भामरागड तालुक्यातील फुलनार येथील पोलिस मदत केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

डॉ. दोरजे पुढे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत गडचिरोली पोलिस दलाने अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आठ नवीन पोलिस ठाणी उभारली आहेत. आता अबूझमाडच्या प्रवेशद्वारावर उभा राहिलेला हा मदत केंद्र स्थानिक नागरिकांसाठी विकासाचा नवा टप्पा ठरेल. अशा केंद्रांमुळे केवळ पोलिस कारवाया प्रभावी होत नाहीत, तर त्या माध्यमातून दुर्गम भागात शांतता, विकास आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होतात. गेल्या पाच वर्षांत गडचिरोली जिल्ह्यातील एकाही तरुणाने नक्षल चळवळीत प्रवेश केला नाही, हे या कार्याचे उत्तम उदाहरण आहे.

स्थानिक आदिवासींना शिक्षण, आरोग्य, इंटरनेट आणि अभ्यासिकेच्या सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा मानस असल्याचेही डॉ. दोरजे यांनी सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांना स्थानिक लोकांशी संवेदनशीलतेने वागण्याचे आणि त्यांच्या अडचणींवर मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. “2003 मध्ये जेव्हा मी वांगेतुरी परिसरात पेट्रोलिंग करायचो, तेव्हा या भागात अबूझमाडचाच जंगलपट्टा दिसायचा. आज त्या ठिकाणी उभारलेले पोलिस ठाणे म्हणजे विकासाचे प्रतिक आहे,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, कमांडंट (सीआरपीएफ 37 बटालियन) दाओ इंजीरकन कींडो, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक सत्य साई कार्तिक, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी, सहाय्यक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, तसेच फुलनार (गुंडुरवाही) मदत केंद्राचे प्रभारी सपोनि युवराज घोडके आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
फक्त एका दिवसात उभारले केंद्र

भामरागडपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावरील गुंडुरवाही या दुर्गम गावापर्यंत पोहोचण्यासाठी पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात या भागाचा संपर्क पूर्णपणे तुटतो. अशा कठीण परिस्थितीत पोलिस जवानांनी गेल्या काही दिवसांत आठ किलोमीटरचा कच्चा रस्ता तयार करून वाहनांची ये-जा शक्य केली. जवळपास 1,050 जवानांनी 4 जेसीबी, 7 ट्रेलर, 2 पोकलेन आणि 25 ट्रक यांच्या मदतीने फक्त एका दिवसात पोलिस मदत केंद्र उभे केले. केंद्रामध्ये 12 पोर्टा केबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट, स्वच्छतागृहे, सुरक्षा भिंत (मॅक वॉल), बी पी मोर्चा आदी सुविधा पुरवण्यात आल्या.













