भामरागड: ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक परिणामकारक व सुसज्ज करण्याच्या दृष्टीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयास आकस्मिक भेट दिली. त्यांनी रुग्णालयातील सध्याच्या सुविधा व अडचणी यांचा आढावा घेतला.
भेटीदरम्यान तालुक्यातील मान्यवर नागरिक व पत्रकार बांधवांनीही डॉ. किलनाके यांच्याशी चर्चा करून रुग्णालयातील विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. यामध्ये रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त असून, ते तातडीने भरावे, अशी प्रमुख मागणी होती. तसेच, रुग्णालयात पूर्ण वेळ डॉक्टर उपलब्ध नाहीत, मशीनरी निष्क्रिय अवस्थेत असून धूळ खात आहे, काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत वी. भी. जी. लिमिटेड अंतर्गत सुरु असलेला आपत्कालीन रुग्णवाहिक 108 ची वाहन जीर्णवस्थेत असल्याने सदर वाहन नेहमी खराब होत असते आणि रुग्णांना रेफर करणे कठीण होत आहे तसेच वारंवार दुरुस्तीला जातं असल्याने संपूर्ण रुग्णावाहिकेचा सेवा कुचकामी ठरत आहे आणि संपूर्ण परिसरात स्वच्छतेचा अभाव आहे, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
सध्या एटापल्ली येथील तालुका आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत असलेले डॉ. भूषण चौधरी यांच्याकडे भामरागड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा प्रभार देण्यात आलेला आहे. मात्र,एटापल्ली तालुका हा भामरागड तालुक्याच्या दुप्पट असल्याने व पावसाळ्यात नदी नाले भरून वाहत असल्याने संपूर्ण मार्ग बंद होत असते परिणामी या ग्रामीण रुग्णालयाचा वाली कोणीच उरत नाही आणि याचा आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
म्हणून सध्या तालुका आरोग्य अधिकारी म्हणून भामरागड येथे पूर्णवेळ कार्यरत असलेले डॉ. मनीष धकाते यांना जर वैद्यकीय अधीक्षक पदाचा प्रभार देण्यात आला तर येथील आरोग्य व्यवस्था किमान मार्गस्थ करता येईल याबाबत त्यांना तात्पुरत्या स्वरूपात देण्याबाबत विचारणा केली असता, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किलनाके यांनी स्पष्ट केले की, याबाबत जिल्हा परिषदेने अद्याप मान्यता नाकारली आहे.तथापि, डॉ. किलनाके यांनी यावर जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समोर हा विषय मांडून त्वरित योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.













