गडचिरोली: राज्यात आकांक्षित जिल्हा म्हणून गडचिरोलीचा समावेश आहे. या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनासह केंद्र शासनाने अनेक विकास कामांचे नियोजन केले. मात्र, मागील तीन वर्षांपासून विकास कामांचा निधीच प्राप्त झाला नाही. या मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसात निधी येण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी सदर निधीवर एका विशिष्ट विभागाची नजर असून तो निधी मिळविण्यासाठी वजनाचा वापर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे संबधित विभाग प्रमुखांनी मागणीनुसार सर्वच विभागाला निधीचे वितरण करावे, अन्यथा असंतोष उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वेगवेगळे विभाग निर्माण केले आहे. सिरोंचा, आलापल्ली, गडचिरोली अशी विभागणी करून दर्जेदार विकास कामे करवून घेण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. या सर्वच विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात सर्कल कार्यालयाचीही निर्मिती करण्यात आली आहे. या सर्कल कार्यालयाच्या माध्यमातून सिरोंचा, आलापल्ली व गडचिरोलीस्थित विभागांवर नियंत्रण ठेवले जात आहे. या विभागाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विकास कामांच्या निधीची मागणी सर्कल कार्यालयाकडे करण्यात येते. त्यानुसार सर्कल कार्यालयाकडून शासनाकडे निधीची मागणी केली जाते. मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्यात काही लेखाशिर्षातील निधी येण्याची शक्यता असून सदर निधी आपल्याच विभागाला मिळावा, असा खटाटोप एका विभागाकडून चालविला जात असल्याची चर्चा आहे. जर त्याच विभागाला सर्व निधी मिळाला तर इतर विभागात काम करणाऱ्यांच्या हातात काय येणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा, आलापल्ली विभागांतर्गत अतिदुर्गम भागातील विकास कामे करण्यात आली आहे. सदर कामे करताना संबंधितांना अनेक समस्यांचा सामना करावा लागते.
अशाही परिस्थितीत शासनाकडून प्राप्त होणारा निधी एका विशिष्ट विभागालाच वितरीत करण्यात येणार असेल तर इतर विभागातील विकास कामे करायचे कशाला? असाही प्रश्न विकास कामे करणाऱ्या यंत्रणांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाने अधिनस्त असलेल्या कार्यालयाच्या मागणीनुसार निधी वितरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. अन्यथा जिल्ह्यातील विकास कामे करणाऱ्या यंत्रणांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
…………………………………………………………………
गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या विकास कामांचा निधी येत्या काही तासात प्राप्त होणार आहे. मात्र, सदर निधीवर एका विशिष्ट विभागीय कार्यालयाची नजर आहे. जिल्ह्याला मिळणारा निधी आपल्याच विभागाला प्राप्त व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे. या चर्चेनुसार निधीचे वितरण झाल्यास जिल्ह्यात असलेल्या इतर विभागांवर मोठा अन्याय होणार असल्याची शक्यता वर्तविली जात असून याचा रोष संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर व्यक्त होण्याचीही भीती वर्तविली जात आहे.













