मुंबई │ पु. ल. देशपांडे महाराष्ट्राचे हॅपीनेस इंडेक्स होते, त्यांनी महाराष्ट्राचा हॅपीनेस इंडेक्स तयार करण्याचे काम केले, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुला’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पु. ल. यांचे साहित्य आणि वक्तृत्व लोकांना दुःख विसरायला लावणारे होते. त्यांचे बोलणे चपखल आणि लिहिणे मर्मभेदी पण कोणालाही न दुखावणारे होते. त्यांनी आपल्या लेखणीने आणि विनोदबुद्धीने महाराष्ट्राला आनंद दिला, त्यामुळे तेच खरे महाराष्ट्राचे हॅपीनेस इंडेक्स होते.
‘व्यक्ती आणि वल्ली’ नव्हे, फक्त ‘वल्ली’ असते!
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणीबाणीच्या काळातील पु. ल. देशपांडे यांचा एक किस्सा सांगितला आणि म्हणाले, आज पु. ल. असते तर त्यांनी राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांना पाहून ‘व्यक्ती आणि वल्ली’ नव्हे, फक्त ‘वल्ली’ असते! असे लिहिले असते.
मराठी कला, साहित्य, संगीत क्षेत्रातील योगदान मोठे
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठी कला आणि संस्कृतीच्या समृद्ध वारशाचा उल्लेख करत लता मंगेशकर, भीमसेन जोशी, आशा भोसले, श्रीराम लागू, निळू फुले, वि. स. खांडेकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.
गावागावांतील नाट्यगृहांसाठी भरीव निधी – मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
संस्कृतीचे मूल्यांकन साहित्य आणि कलानिर्मितीवर होते, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या गावागावांतील नाट्यगृहांच्या दुरुस्तीचे काम करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
या उद्घाटन सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अॅड. आशिष शेलार, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. कालिदास कोळंबकर, आ. भाई गिरकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.













