गडचिरोली:राज्याच्या शेवटच्या टोकावरील व छत्तीसगड सीमेवर असलेल्या भामरागड तालुका मलेरियाचे ‘इंडेमिक झोन’ आहे.येथून १८ किलोमिटर अंतरावर असलेल्या लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील बऱ्याच उपकेंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांचे पदे रिक्त असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.त्यामुळे आरोग्य व्यवस्थाच आजारी पडल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका हा सर्वात दुर्गम व अतिसंवेदनील म्हणून ओळखला जातो.या तालुक्यातील सर्वात शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगड सीमेवर असलेल्या लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात,गोंगवाडा, नेलगुंडा, धोडराज,मिडदापल्ली,लाहेरी,मल्लमपोडुर,बिनागुंडा, फोदेवाडा आणि कुव्वाकोडी एकूण ९ उपकेंद्र आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण १० हजार ३६० एवढी लोकसंख्या असून ४३ दुर्गम डोंगराळ भागातील गावांचा समावेश आहे.पक्के रस्ते,नदी-नाल्यावर पूल नसल्याने आणि गावापासून प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर जास्त असल्याने दुर्गम भागातील आरोग्याची जबाबदारी हे गावातील उपकेंद्रावरच अवलंबून असते.मात्र,बिनागुंडा, फोदेवाडा आणि कुव्वाकोडी या आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविकेचे पद रिक्त असल्याने दुर्गम भागातील रुग्णांचे हाल होत आहेत.
अतिदुर्गम व आदिवासीबहुल भागात माता व बालसंगोपन करून माता व बालमृत्यू रोखण्यासाठी बऱ्याच ठिकाणी आरोग्य उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली.लाखो रुपये खर्च करून ईमारत देखील उभे करण्यात आले.मात्र त्याठिकाणी प्रसूतीपूर्व तपासणी, सामान्य आजारांवर उपचार, माता आणि बाल आरोग्य सेवा, क्षयरोग, एचआयव्ही आणि कुष्ठरोग, औषधोपचार यासारख्या आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सेविकेचे पद रिक्त असून केवळ मलेरिया वर्कर कामावर आहेत.प्राप्त माहितीनुसार लाहेरी,गोंगवाडा, नेलगुंडा,मिडदापल्ली उपकेंद्र तसेच लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ओपीडी साठी स्थायी आरोग्य सेविका नाही मात्र,कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.तर मलमपोडुर येथे मलेरिया वर्कर नाही. फोदेवाडा,बिनागुंडा आणि कुव्वाकोडी येथे आरोग्य सेविकेचे पद अजूनही रिक्त आहेत.
पावसाळ्यात होणार रुग्णांचे हाल
लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या व येथील २५ किमी अंतरावर असलेल्या कुव्वाकोडी हे महाराष्ट्रातील शेवटचं गाव.शिवाय भागात फोदेवाडा,बिनागुंडा,कुवाकोडी, पेरमीलभट्टी,तूर्रेमर्का,पुंगासुर,दामनमर्का,होड्री,लष्कर,गोपणार, गुंडेनुर आदी गावातील रुग्ण लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात. मात्र पावसाळ्यात ही सर्व गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर जातात त्यामुळे या भागातील रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. बिनागुंडा, फोदेवाडा आणि कुव्वाकोडी या तीन उपकेंद्रात आरोग्य सेविकेचे पद भरल्यास पावसाळ्यात किमान या भागातील नागरिकांना वेळेवर प्राथमिक उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
बिनागुंडा,फोदेवाडा व कुव्वाकोडी उपकेंद्रात या परिसरातील पाहाडीवर वसलेली अनेक गावं आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र दूर असल्याने गावातील रुग्णांना उपकेंद्रात गेल्याशिवाय पर्याय नाही. मात्र या ठिकाणी आरोग्य सेविकेचे महत्त्वाचे पद रिक्त असल्याने या भागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय पावसाळ्यात रुग्णांचे मोठे हाल होणार आहेत.त्यामुळे या भागातील स्थानिकांना प्राधान्य देऊन भरती करावे.
-लक्ष्मीकांत बोगामी,अध्यक्ष-काँग्रेस कमिटी भामरागड