त्वरीत दुरुस्ती करून वाहतूक सुरू करा रिना पाटील यांची मागणी अन्यथा आंदोलन करु
चिमूर (सुभाष खानोरकर ):- तालुक्यातील वडसी वरुन विहीरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठं- मोठे खड्डे पडले असून पाणी जाण्याच्या वाटेतील पाईप फुटल्यामुळे रस्त्यावर मधोमध मोठा खड्डा पडल्यामुळे चारचाकी वाहनाची वाहतूक बंद झाली आहे.दुचाकी वाहन चालवताना नाहक त्रास होत असुन दुचाकी चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. पावसाड्याच्या दिवसात या परीसरातील नागरिकांना हाच एकमेव रस्ता असुन या रस्त्यावरील मोठ्या खड्याची त्वरीत दुरुस्तीकरुन वाहतूक सुरू करा अशी मागणी रिना पाटील यांनी केली आहे.
सदर रस्ता या परीसरातील गावांसाठी महत्त्वपूर्ण असुन दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचा आहे.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व बफर झोन मध्ये जाण्यासाठी कोलारा गेट व बफर चे गोडमोहाळी बेलारा गेट,पडसगाव गेट, मदनापूर गेट,शिरखाळा गेटला जाण्यासाठी या रस्त्याने पर्यटक ये जा करीत असतात.याच मार्गाने पडसगाव,विहीरगाव, मदनापूर,मासळ या परीसरातील अनेक गावांतील नागरिक नवरगाव व नेरीकडे जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा व जवळचा असल्याने ये- जा करीत असतात. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते.याच मार्गांवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमी श्रीक्षेत्र गोंदेडा येथे भेट देण्यासाठी पर्यटक येतात.या परीसरातील शेतकरी वर्ग याच रस्त्याने येणे-जाने करावे लागते.तसेच आता विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू झाल्या विद्यार्थ्याना याचं रस्त्याने येणे-जाणे करावे लागते.करीता त्वरीत रस्ता बनवा किंवा रस्त्यावर मुरुम तरी टाका अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चिमूर,आमदार बटी भांगडीया चिमूर विधानसभा क्षेत्र यांना वडसी ग्राम पंचायत सदस्या रिना पाटील यांनी निवेदन दिले होते. या रस्त्यावर दुर्लक्ष केल्याने संततधार पावसामुळे रस्त्यावर मधोमध मोठा खड्डा पडल्यामुळे वडसी, विहीरगाव , वाघेडा,बेलारा ,पडसगाव,कडेगांव,पिपर्डा मदनापूर,मासळ कडे जाणारी चारचाकी वाहतूक बंद झालेली आहे.शेतकऱ्याना शेती कामाचे दिवस असल्याने या रस्त्याची वाहतूक सुरू करा अन्यथा संबंधित विभागात येवुन आंदोलन करु असा इशारा रिना पाटील यांनी दिला आहे.