अहेरी: संपूर्ण राज्यभरात विविध उपक्रमाद्वारे निरंतर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येत असताना दुसरीकडे मोठ्याप्रमाणात सर्रासपणे बहूमूल्य वृक्षांची कत्तल केली जात आहे.असाच काही प्रकार सिरोंचा वनविभागातील कमलापूर वनपरिक्षेत्रात पाहायला मिळत आहे. कमलापूर वनपरिक्षेत्रातील राजाराम उपक्षेत्रात सर्रासपणे शेकडो वृक्षांची कत्तल झाल्याची माहिती समोर येत आहे.मात्र,याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.
सिरोंचा वनविभागात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे.२०२२ मध्ये सिरोंचा तालुक्यातील चिट्टूरचा प्रकरण चांगलाच गाजला होता. त्यांनतर हे प्रकरण ताजे असताना कमलापूर वनपरिक्षेत्रात राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या छल्लेवाडा जंगल परिसरात काही लोकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली.सिरोंचा वन विभागात असे अनेक प्रकरण ताजे असतानाच आता परत एकदा कमलापूर वनपरिक्षेत्रातील राजाराम उपक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केल्याची घटना घडली.या घटनेची माहिती घेण्याकरिता येथील वनपरिक्षेत्र अधिकारी गौरेश गडमडे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केले असता नुकतेच ऋजु झाल्याने परीपूर्ण माहिती नसल्याचे सांगितले.तर राजारामचे क्षेत्र सहाय्यक एम.जे.धामनगे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घ्या भ्रमणध्वनीवर माहिती देणार नसल्याचे सांगितले.
कमलापूर वनपरिक्षेत्रात कमलापूर, आशा,कोडसेपल्ली आणि राजाराम या चार उपक्षेत्रांचा समावेश असून या परिसरात मागील काही वर्षांपासून अवैध वृक्षतोड,अवैध उत्खनन सर्रासपणे सुरू आहे.एवढेच नव्हेतर वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे.मात्र,यावर अंकुश लावण्यास वनविभागाला अजूनपर्यंत यश आले नाही.राजाराम उपक्षेत्रात राजाराम-१,राजाराम-२, चिरेपल्ली आणि तिमरम या नियातक्षेत्रांचा समावेश आहे. याठिकाणी क्षेत्रासहायकांसह बरेच वनरक्षक कार्यरत आहेत.असे असताना देखील सर्रासपणे वृक्षांची कत्तल केली जात असेल तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
या उपक्षेत्रात विविध प्रजातीच्या शेकडो वृक्षांची कत्तल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.अवैध वृक्षांची कत्तल नेमकं कुणी केली हे वन विभागाला शोध घ्यावं लागणार असलेतरी या प्रकरणात वनविभाग किती गंभीरतेने चौकशी करणार आणि सेवेत कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
——————————————
कमलापूर वनपरिक्षेत्रात झालेल्या अवैध वृक्षतोडीचे त्रयस्थ समितीमार्फत बीट चौकशी करावी व मागील पाच वर्षांपूर्वी किती जंगल होते आणि आता किती जंगल उरले याचेही उत्तस्तरीय चौकशी करावी.तसेच नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वृक्षांच्या मूल्यांकनानुसार रक्कम वसुली करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय,भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.













