गडचिरोली:केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील शाळांमध्ये परसबागा निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून स्पर्धा घेण्यात येत आहे. ही स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर घेण्यात येत असून,या स्पर्धेमुळे राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात परसबागांची निर्मिती होत आहे.या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणात पोष्टिक आहार मिळायला देखील सुरुवात झाली आहे. राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तयार करण्यात आलेल्या परसबागांचा मूल्यमापन करून त्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे पारितोषिक देण्यात येत आहेत.२०२३-२४ या शैक्षणिक सत्रात घेण्यात आलेल्या स्पर्धेचे निकाल नुकतेच २५ सप्टेंबर रोजी जाहीर झाला असून आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा पंचायत समिती अंतर्गत समाविष्ट उदयनगर जिल्हा परिषद बांग्ला प्राथमिक शाळेने राज्यातून प्रथम पारितोषिक पटकाविले आहे.
राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ दिला जातो. केंद्र सरकारच्या २०१९ मधील निर्देशानुसार विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे यांचा समावेश शालेय पोषण आहारात केला जातो. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होवून त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे, ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होवून विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होण्याचे हेतू या उपक्रमातून साध्य होत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये राज्यातील शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी स्पर्धा आयोजित करून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि तीन शाळांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येत आहे.राज्य स्तरावर प्रथम पारितोषिक ५१ हजार,द्वितीय पारितोषिक ३१ हजार आणि तृतीय पारितोषिक २१ हजार असे राहणार आहे.
उदयनगर हे गाव मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असून या गावाची लोकसंख्या जेमतेम दोनशेच्या घरात आहे.गावात १ ते ५ वी पर्यंत शाळा असून या शैक्षणिक सत्रात पाटावर केवळ २० विद्यार्थी आहेत.त्यांना शिकविण्यासाठी दीपक मंडल नामक एकच शिक्षक आहेत.मात्र, अश्याही परिस्थितीत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत जिल्हा परिषद बांग्ला प्राथमिक शाळा उदयनगरने भाग घेत तालुका,जिल्हा आणि आता चक्क राज्य स्तरावर प्रथम पारितोषिक पटकाविले आहे.यासाठी शाळेतील विद्यार्थी,शालेय व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी स्वतः श्रमदान करून उत्तम असा परसबाग तयार केला.
परसबागेचा असा झाला मूल्यांकन
तालुका आणि जिल्हास्तरासाठी संबंधित केंद्रप्रमुख, गटशिक्षण अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व प्रगतशील शेतकरी,शिक्षणाधिकारी (प्राथमिक आणि माध्यमिक) यांनी मूल्यांकन केले होते. त्यानंतर राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी पीएम पोषण पुणेचे अधीक्षक मोहन मुळे यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट पाहणी करून मूल्यांकन केले.
सुरुवातील केंद्र स्तर,१८ डिसेंबर २०२३ रोजी तालुका स्तर,१९ जानेवारी २०२४ रोजी जिल्हा स्तर आणि ६ मार्च २०२४ रोजी राज्य स्तरीय मूल्यांकन करण्यात आले.नुकतेच २५ सप्टेंबर रोजी शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी या स्पर्धेचा निकाल जाहीर केला यात उदयनगर शाळेने चक्क राज्यातून प्रथम पारितषिक पटकाविला आहे. येत्या २९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या ठिकाणी सकाळी नऊ वाजता आयोजित कार्यक्रमात येथील शिक्षक दीपक मंडळ व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचे सन्मान करण्यात येणार आहे.या स्पर्धेत गडचिरोलीतून जिल्हा परिषद बांग्ला प्राथमिक शाळा उदयनगरने प्रथम, धाराशिव जिल्ह्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडीने आणि धाराशिव जिल्ह्यातून,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळी या दोन्ही शाळेने द्वितीय तसेच नाशिक जिल्ह्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबडपाल ने तृतीय पारितोषिक पटकाविला आहे.तर प्रोत्साहनपर म्हणून वर्धा जिल्ह्यातील जि प शाळा लिंगापूर,कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यामंदिर मळवी,बीड जिल्ह्यातील जि प प्राथमिक शाळा झरेवाडी या शाळांना देखील पारितोषिक देण्यात येणार आहे.
परसबागेत काय ?
सदर परसबागेत भेंडी कांदा फुलकोबी मेथी मुळा गवार बरबटी गाजर टमाटर वांगी लसूण यासह आदी विविध प्रकारच्या पाले भाज्या आणि पपई,पेरू,केळी,लिंबू,नारळ असे विविध प्रकारच्या फळ झाडे आहेत. राज्यस्तरीय मूल्यांकनाचा वेळी पी एम पोषण चे अधीक्षक मोहन मुळे यांना याठिकाणी तब्बल ८१ प्रकारचे भाजीपाला,फळ झाडे आढळून आले.विशेष म्हणजे येथील शिक्षक दीपक मंडल हे या शाळेत २०१७ मध्ये रुजू झाले तेंव्हा शालेय आवारात काटेरी झुडूप होता.जेसीबीच्या सहाय्याने परिसर स्वच्छ करत त्यांनी परसबाग तयार करण्यासाठी दोन वेळा हातपंप टाकण्याचा प्रयत्न केला मात्र पाणीच लागला नाही. तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं आणि गावकऱ्यांचा सहकार्याने त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घ्यायला सुरुवात केली. त्यांचा सुरुवातीचा छोटासा प्रयत्न आज राज्यात या शाळेची ओळख निर्माण झाली आहे.