गडचिरोली: रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.
रविवार (८सप्टेंबर) च्या रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातला आहे. रात्रीपासून सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने आज सकाळच्या सुमारास भामरागड तालुका मुख्यालयातील पर्लकोटा नदी तुडुंब भरून वाहत आहे. पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.या पावसाळ्यात सहाव्यांदा भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी तुटला आहे हे विशेष.
विशेष म्हणजे जिल्ह्याच्या दक्षिण भागात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या भागातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. बरेच रस्त्यावरील छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. तर राष्ट्रीय महामार्गावरील देखील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वळण मार्ग तयार करण्यात आले आहे.बरेच वळण मार्गावरून देखील पाणी वाहत आहे. दरम्यान पर्लकोटा नदीचा पाणी हळूहळू शहरात शिरत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.