गडचिरोली:- गुरुवार (६ जून) रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्या चिखलात ट्रक अडकल्याने या महामार्गावर सकाळपासून वाहतूक ठप्प झाली आहे.
आलापल्ली ते सिरोंचा (३५३ सी) या राष्ट्रीय महामार्गाचे मागील दीड ते दोन वर्षापासून काम आहे.शंभर किलोमीटरच्या अंतरावर रस्त्याचे आणि मोठ्या प्रमाणावर पुलाचे बांधकाम सुरू आहे.मात्र सदर बांधकाम संत गतीने सुरू असल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू आहेत.तर काही ठिकाणी बांधकाम करण्यासाठी केवळ खड्डे खोदून ठेवले आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्यावर खड्डे खोदण्यात आले. मात्र मजबूत व व्यवस्थित पर्यायी रस्ता नसल्याने मागील काही दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प होताना दिसत आहे.
गुरुवारी ६ जून रोजी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. गुंडेरा ते जिमलगट्टा दरम्यान नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचला. एवढेच नव्हे तर माती आणि मुरूम टाकून तयार केलेल्या पर्यायी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या चिखलात ट्रक (जड वाहन) अडकल्याने सकाळपासून या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी शेकडो वाहनांचे रांगा लागले आहे.
मागील वर्षी पावसाळ्यात या राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांना होणारी अडचण लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी पावसाळ्यादरम्यान जड वाहतुकींना बंदी घातली होती. यंदा देखील ही बंदी घालण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र अजूनही या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे संबंधित कंत्राटदाराने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पुलाचे बांधकाम सुरू केले असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. अशावेळी व्यवस्थित पर्यायी मजबूत रस्ता तयार करून देणे गरजेचे होते.मात्र, तात्पुरत्या स्वरूपात माती आणि मुरूम टाकून पर्यायी रस्ता केल्याने आता या भागात अनेक ठिकाणी जड वाहने अडकून पडत आहेत. त्यामुळे वारंवार नागरिकांना या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. भर रस्त्यावर जड वाहने अडकल्याने रुग्णांचे देखील हाल होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल यावी अशी मागणी केली जात आहे.