गडचिरोली:जिल्ह्यात एक विचित्र बातमी समोर आली आहे.भामरागड तालुक्यातील दोघेजण रविवारी (८ सप्टेंबर) रोजी बोटीच्या साहाय्याने गुंडेनुर नाला ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात बोट उलटली. तुडुंब भरलेल्या नाल्यातून एकजण कसेबसे बाहेर पडला तर दुसरा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. दोन दिवसांनंतर गावकऱ्यांनी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह शोधण्यासाठी गेले असता सदर इसम तुडुंब भरलेल्या नाल्याच्या मधोमध झाडावर अडकून होता.गावकऱ्यांना पाहून त्याने जोराचा आवाज देताच गावकऱ्यांनी धाव घेत रेस्क्यु करत बाहेर काढले.दलसु अडवे पोदाडी असे त्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचे नाव असून दोन रात्र एक दिवस असा ३६ तास तो झाडावर अडकून होता.अखेर गावकर्यांना ‘देव तयारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय आला.
नेमकं काय घडलं ?
भामरागड तालुक्यातील लाहेरी पलीकडील बहुतांश गावे पावसाळ्यात संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतात.लाहेरी वरून ४ किलोमीटर अंतरावर गुंडेनुर गाव आहे. त्या पलीकडे अजून डझनभर गावांचा समावेश आहे.लाहेरी आणि गुंडेनूर या दोन गावांच्या मधोमध एक मोठा नाला वाहतो.सदर नाला मोठा असून पावसाळ्यात या नाल्याला नदीचं स्वरूप येत असतो.या भागातील आदिवासींना शेतीसाठी खते, जीवनावश्यक वस्तू,आठवडी बाजार तसेच विविध कार्यालयीन कामासाठी लाहेरी आल्याशिवाय पर्याय नाही.लाहेरी वरूनच पुढील प्रवास सुरु होतो.दरवर्षी पावसाळ्यात या नाल्यातुन बोटीच्या साहाय्याने किंव्हा कंबरभर पाण्यातून जलप्रवास करताना अनेकांचे जीव गेले आहे.
नागरिकांची अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू केले मात्र पावसाळा असल्याने बांधकाम थांबले आहे.त्यामुळे या भागातील आदिवासी लाकडी बोटीच्या सहाय्यानेच ये-जा करतात.रविवारी लाहेरी येथील आठवडी बाजार करून सायंकाळच्या सुमारास गुंडेनूर येथील विलास पुंगाटी आणि दलसु पोदाडी ही दोन इसम आपल्या गावाकडे जाण्यासाठी लाकडी बोटीने गुंडेनुर नाला ओलांडत होते.अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन बोट तुडुंब भरलेल्या नाल्यात उलटली. त्यातील विलास पुंगाटी हा कसेबसे पाण्याच्या प्रवाहातून पोहत पोहत बाहेर पडला.मात्र,दलसुअडवे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
विलास ने आपला गुंडेनुर गाव गाठल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ सप्टेंबर रोजी गावातील लोकांना आपभीती सांगितली.मात्र,रविवार पासून या भागात प्रचंड पाऊस आहे.नदी-नाले तुडुंब भरून वाहत असल्याने दलसू अडवे पोदाडी याचा जीव गेला असणार असा गावकऱ्यांना वाटला. मंगळवारी पावसाने विश्रांती घेताच गावकऱ्यांनी सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह शोधायला बाहेर पडले.गुंडेनूर नाल्याजवळ शोधमोहीम राबवित असताना तुडुंब भरलेल्या नाल्याच्या मधोमध एक झाडावरून जोराचा आवाज येतो.तेंव्हा दलसू हा जिवंत असल्याचे गावकऱ्यांना कळताच त्यातील काही नागरिकांनी परत गाव गाठून बचाव साहित्य आणून तुडुंब भरलेल्या नाल्यातून तब्बल दीड ते दोन तास रेस्क्यू करत त्याला बाहेर काढले.
विशेष म्हणजे रविवार पूर्ण रात्र,सोमवार दिवस आणि रात्र असे तब्बल ३६ तास किर्र जंगलातील तुडुंब भरलेल्या नाल्यात दलसू न जेवता,न पाणी पिता झाडावर जिवंत होता.अजूनही या भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे.दलसू ला तुडुंब भरलेल्या नाल्यातून बाहेर काढताना गावकर्यांची मोठी तारांबळ उडाली.त्याला वाचविण्यासाठी अख्ख गाव पाण्यात उतरला होता.
दलसूचे वडील याच नदीत वाहून गेले
या भागातील आदिवासींना सदर नाला पार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.लाहेरी पलीकडील गावांत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील अश्याच परिस्थितीचा सामना करावा लागतो.या नाल्यात या भागातील अनेक नागरिकांचे जीव गेले आहे.दरवर्षी दिवाळी नंतर पाण्याचा प्रवाह कमी होताच या भागातील आदिवासी बांधव श्रमदनातून बांबूच्या ताटव्यांचा पूल तयार करून ये-जा करतात.मागील काही वर्षांपूर्वी दलसू चे वडील अडवे देखील याच नाल्याच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.मात्र मुलगा या संकटातून बाहेर पडला आहे.