गडचिरोली: गावालगत असलेल्या जंगल परिसरात चराईसाठी गेलेल्या गायीवर वाघाने हल्ला करत गायीला ठार केले आहे.ही घटना मुलचेरा तालुक्यातील अंबेला ते घोट रस्त्यावरील जंगल परिसरात सोमवार (९ सप्टेंबर) रोजी घडली.
या परिसरात वाघाचा वावर असून वारंवार घडत असलेल्या अशा घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.९ सप्टेंबर अंबेला येथील रोजी कैलास बावणे आणि अनिल चौधरी या दोघांनी आपल्या गावातील पाळीव प्राण्यांना गावा लगत असलेल्या जंगल परिसरात चराईसाठी नेले असता वन विकास महामंडळाच्या खंड क्रमांक १९ मध्ये दुपारी तीन वाजताच्या सुमारास वाघाने एका गायीवर हल्ला करत ठार केले. वाघाला डोळ्याने बघितल्यावर कैलास बावणे आणि अनिल चौधरी यांनी गावाकडे धाव घेतली.सदर गाय ही अनिल चौधरी यांची असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
मागील काही दिवसापासून मुलचेरा तालुक्यातील अंबेला ते घोट रस्त्यावरील जंगल परिसरात वाघाची दहशत सुरू आहे.अंबेला गावातील पाळीव प्राण्यांना एक एक करत वाघाने हल्ला चढविला आहे. आतापर्यंत जवळपास चार ते पाच गायी, बैलावर वाघाने हल्ला करत ठार केले आहे.नुकतेच ७ सप्टेंबर रोजी अशीच एक घटना याच परिसरातील खंड क्रमांक १८ मध्ये उघडकीस आल्यावर ८ सप्टेंबर रोजी वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.आज परत ही दुसरी घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
मागील काही दिवसापासून वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे.मात्र वनविकास महामंडळाकडून याकडे अक्षरशः दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच वारंवार अशा घटना घडत असल्याचे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. ही घटना अंबेला गावावरून जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावर घडल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
एफडीसीएमच्या कर्मचाऱ्यांची मुजोरी
वाघाच्या हल्ल्यात अंबेला गावातील गायी ठार झाल्याने येथील शेतकऱ्यांनी वन विकास महामंडळ च्या कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून माहिती दिली.मात्र नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची एक न ऐकता त्या कर्मचाऱ्याने उलट खडे बोल सुनावले. तुम्ही पत्रकारांना माहिती का देता ? असा प्रश्न करत गावकऱ्यावर चिडले.
एकीकडे वाघाची दहशत आणि गावकऱ्यांचा होत असलेला नुकसान यावर वनविकास महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तोडगा काढून त्यांना नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.एवढेच नव्हे तर वाघाचा बंदोबस्त करणे देखील गरजेचे आहे. मात्र तसे न करता माहिती देणाऱ्या गावकऱ्यांवरच सदर कर्मचारी चिडल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडून संताप व्यक्त केला जात आहे.