अहेरी: गडचिरोली जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसापासून मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे दक्षिण भागातील अहेरी, सिरोंचा, भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात झालेल्या पूर परिस्थितीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून प्रत्येक घरापर्यंत जाऊन तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ अहवाल द्या असे स्पष्ट निर्देश अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिले आहे.
अहेरी, सिरोंचा, भामरागड आणि एटापल्ली ही चार तालुके अहेरी अपर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत येत असून त्यांनी सर्व विभाग प्रमुखांची सोमवारी (२२ जुलै) रोजी स्थानिक तहसील कार्यालयात आढावा सभा स्पष्ट निर्देश दिले आहे.
या आढावा सभेला तहसीलदार बालाजी सोमवंशी,गटविकास अधिकारी राहुल वरठे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बळवंत रामटेके,तालुका आरोग्य अधिकारी डॉ किरण वानखेडे,मुख्याधिकारी एन सी दाते, सार्वजनिक बांधकाम विभागा आलापल्लीचे उपअभियंता रविकिरण पारेलवार, राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता सारंग गोगटे,सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्लीचे अभियंता अतुल ढोले, राष्ट्रीय महामार्गाचे सिरोंचाचे अभियंता वैभव वैद्य,एच ए साळुंके,कृषी विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ माहिती सादर करणे,प्रत्येकाच्या घरी जाऊन मोका पंचनामा करणे,पूर ओसरल्यावर रोगराई पसरू नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात यावे,शेतीचे झालेल्या नुकसान बाबत तात्काळ माहिती देणे,जल स्रोत शुद्ध करणे,रोगराई पसरल्यास रुग्णांना तात्काळ दाखल करणे, गरोदर मातांची योग्य काळजी घेणे तसेच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे देखील सक्तीचे केले आहे.जे अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी राहणार नाही त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमा अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.
चारही तालुक्यातील नुकसंग्रस्तांना शासनाकडून तात्काळ मदत देण्याच्या अनुषंगाने सर्व विभागांच्या समन्वयातून सहकार्य करण्याचे आवाहन करतानाच सर्वसामान्यांची कुठलीही तक्रार येणार नाही याची खबरदारी घेऊन सर्व यंत्रणेने सज्ज राहून काम करा असे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी स्पष्ट सूचना दिले.तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी व्हीसी द्वारे आवश्यक माहिती तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले.प्रत्येक विभागाला स्वतंत्र फॉरमॅट मध्ये माहिती त्यांनी मागितली आहे.तर सर्व यंत्रणांनी सज्ज राहून दिलेल्या कालावधीत उपाययोजना करण्यासाठी त्यांनी डेडलाईन दिली आहे.
रस्ते विकासाबाबत ऍक्शन प्लॅन तयार करा
अहेरी उपविभागात रस्त्यांची फार दयनीय अवस्था झाली असून राष्ट्रीय महामार्गासह,राज्य मार्गाची देखील वाट लागली आहे.पावसामुळे तात्पुरत्या सवरूपात तयार केलेले वळण मार्ग वाहून गेल्याने रहदारी ठप्प झाली आहे.या सर्व रस्त्यांची व पुलांची यंत्रणानिहाय माहिती योग्य प्रपत्रात सादर करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.नागरिकांची अडचण लक्षात घेता राष्ट्रीय महामार्गावरील व राज्य मार्गावरील वळण मार्ग त्वरित दुरुस्त करून रहदारी सुरू करा एवढेच नव्हेतर खराब झालेले रस्ते व पूल बांधकामाचे एक्शन प्लॅन सादर करण्याचे निर्देश आणि त्यांना टाईमलाईन अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी संबंधित विभाला दिले.