गडचिरोली:मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी निर्माण झाली आहे.अहेरी उपविभागातील सिरोंचा आणि भामरागड या तालुक्यांचा अहेरी मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.एटापल्ली,भामरागड, सिरोंचा आणि अहेरी ही चार तालुके अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जातात. एकीकडे पूर परिस्थिती, रस्त्यांची दयनीय अवस्था आणि त्यातच २८ जुलै पासून सुरू झालेला नक्षल्यांचा शहीद सप्ताह.यामुळे या चार तालुक्यातील दुर्गम गावांना अधिकाऱ्यांना भेट देणे शक्य नसल्याने अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी पहिल्यांदाच दूरदृष्टी प्रणालीद्वारे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
सध्याच्या परिस्थितीत भामरागड, सिरोंचा आणि एटापल्ली तालुक्यातील बरेच गावातील नागरिक जिल्हा मुख्यालय तर सोडा किमान अहेरी पर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे तालुका पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या,विविध विभागाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत थेट छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली. विशेष म्हणजे नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रभारी जिल्हाधिकारी पदाचा त्यांनी कार्यभार सांभाळले.त्यादरम्यान त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर ‘जनसंवादातून सुशासनाकडे’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला होता. सध्या अहेरी उपविभागातील परिस्थिती लक्षात घेता त्यांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्वांना एकत्रित आणून एटापल्ली,सिरोंचा आणि अहेरी या तीनही तालुक्यातील अतिदुर्गम गावातील नागरिकांच्या आरोग्य, शिक्षण,शेती,पूरपरिस्थिती त्यासोबतच विविध समस्या जाणून घेतली.
दुर्गम भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहण्याबाबत, आरोग्यसेवेसंबंधी आवश्यक कामांसाठी निधीची मागणी करण्याबाबत, रस्ते वाहतूक सुरळीत ठेवणेबाबत व नुकसाणीचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्याबाबत यंत्रणेला सूचना दिली. एवढेच नव्हे तर यावेळी वांगेझरी येथील सर्पदंश झालेले रूग्ण बापूराव वासुजी शेंडे, कोटमी आश्रमशाळेतील आजारी विद्यार्थी अनिल माझी कवडो, कसनसूर येथील इतर दोन रुग्ण आणि कल्लेड येथील काही शेतकऱ्यांशी त्यांनी थेट संवाद साधला. विशेष म्हणजे या चार तालुक्यातील बरेच गावांमध्ये वीज सुद्धा पोहोचली नव्हती. मात्र आता या भागातील नागरिक थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना सुद्धा प्रत्यक्ष समस्या मांडण्याची संधी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.
अतिदुर्गम भागातील नागरिकांशी दूरदृष्टी प्रणालीद्वारे थेट संवाद साधून समस्या जाणून घेण्यात आले. एटापल्ली, अहेरी, सिरोंचा या तीन तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना एकत्र करून समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्याबाबत निर्देश देण्यात आले. भामरागड तालुक्यामध्ये मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे आढावा घेता आले नाही.अशा उपक्रमामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटतील आणि प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी फायदा होणार आहे.
-विजय भाकरे,अप्पर जिल्हाधिकारी,अहेरी